स्मरणशक्ती ही आपल्याला लाभलेली देणच आहे. मात्र, आपण तिचा किती उपयोग करतो हे कोडेच असते. एखादी गोष्ट लक्षात ठेवणे ही खरे तर एक कलाच आहे. म्हणजे नेमके काय, याची उलगड करण्यासाठी मेमरी मॅनेजमेंट अर्थात, स्मरणशक्ती व्यवस्थापनात प्रशिक्षण देणारे तज्ज्ञ विष्णू चौधरी सरांसोबत संतोष देशपांडे यांनी संवाद साधला. यातून उलगडल्या अनेक गोष्टी ज्या आपल्याला या कलेच्या अगदी जवळ घेऊन जातात. मेमरी मॅनेजमेंट प्रत्येकाला सहज करता येतं आणि त्यातून त्यांच्या आयुष्याला नवी दिशाही मिळू शकते, याचा आत्मविश्वास जागवणारा हा खास पॉडकास्ट खास आपल्यासाठी.
जगभरात दिवाळी साजरी होत असताना आपल्या अंतःकरणात तेज कसे जागवावे, जीवनात खरा प्रकाश कसा आणता येईल, याचं सुरेख विवेचन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे योगगुरु डॉ. संप्रसाद विनोद यांनी संतोष देशपांडे यांसमवेत रंगलेल्या या दिवाळी स्पेशल पॉडकास्टमध्ये केले आहे. प्रत्येकाने जरुर ऐकावे आणि अंतरात साठवावे आणि समृद्ध व्हावे असे हे मौलिक विचारधन.
गोष्ट ऐकणे ही प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य गोष्ट. गोष्ट सांगण्याचे, ऐकण्याचे माध्यम बदलत जात आहे. पारंपरिक पुस्तक, चित्रपटांपलीकडे जात ऑडिओबुक्स, शॉर्टफिल्म्स आता प्रचलित झाले आहेत. आता मोबाईलच्या माध्यमातून व्हर्टिकल स्टोरीटेलिंगचा ट्रेंडही जोरात सुरु आहे. या सर्व स्थित्यंतराचा वेध स्टोरीसाइड इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ यांनी संतोष देशपांडे यांसमवेत रंगलेल्या या पॉडकास्टमध्ये घेतला आहे.
मृत्युनंतर नेमकं काय घडतं, याचं अनेकांना कुतुहल असतं. मात्र, हा विषय फारसा चर्चिला जात नाही. याच विषयाची सविस्तर उलगड करण्यासाठी हा मेटाफिजिक्स अभ्यासक आणि अध्यात्मिक समुपदेशक म्हणून कार्यरत असणाऱ्या लेखिका डॉ. मनिषा अन्वेकर यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेला विशेष संवाद. व्यक्ती मरते म्हणजे काय घडते, माणसाला मृत्युची चाहूल लागते का, जन्म-मृत्यू आणि कर्माचा संबंध असतो का, मृत्यू हा विधिलिखत असतो का, आत्महत्या करणाऱ्यांच्या बाबतीत काय घडतं, आत्म्याशी खरंच संवाद होऊ शकतो का, श्राद्धकर्मे गरजेची असतात का या व अशा अनेक गूढ दडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधणारा हा वेगळा पॉडकास्ट.
हा पॉडकास्ट युट्यूबवर पाहण्यासाठी - https://youtu.be/iPootIBEITs
मराठी लोकांमध्ये उद्यमशीलतेचा अभाव असल्याने ते उद्योग-व्यवसायात मागे पडतात, मुळात उद्योग करणे हा त्यांचा पिंडच नाही ही सामाजिक धारणा अजूनही आपल्याकडे आहे. ती मोडीत काढून व्यवसायात असणाऱ्या मराठीजनांना एका सूत्रात बांधत एकमेकांच्या साहाय्याने उद्योगात यश मिळवता येते, हे सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टने दाखवून दिले. कै. माधवराव भिडे यांच्या प्रयत्नांतून आणि प्रेरणेतून रुजलेले हे बीज आता चळवळ बनून अनेक मराठी उद्योजकांच्या आयुष्यात नवी पहाट घेऊन आले आहे. `एकमेका साहाय्य करु, अवघे होऊ श्रीमंत` हे ब्रीद सार्थ करण्यासाठी आता `सॅटर्डे क्लब` महाराष्ट्रातच नव्हे तर देशात तसेच परदेशातही विस्तारते आहे. या पार्श्वभूमीवर, सॅटर्डे क्लबची सुरवात, आजवरचा प्रवास, त्यातील वैशिष्ट्ये आणि त्यातून उद्योजकांना मिळत असलेले फायदे याचा लेखाजोखा मांडण्यासाठी संतोष देशपांडे यांनी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे सरचिटणीस (सेक्रेटरी जनरल) सुहास फडणीस यांना बोलता केलं आणि उलगडत गेला एका उद्यमशील चळवळीचा प्रेरणादायी पट. प्रत्येक मराठीजनाने आवर्जून ऐकावा, जाणून घ्यावा असा हा विषय आणि त्यातील प्रेरक आशय.
ढोलताशा पथक हे पुण्याच्याच नव्हे एक महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीतील एक अविभाज्य अंग आहे. विशेषतः गणेशोत्सवातील ढोलताशांचा निनाद हा सर्वांनाच भुरळ घालतो. अशा ढोलताशा पथकांमध्ये महिलावर्गाचाही फार मोठा सहभाग असतो. या महिलावर्गाचा विशेषतः पथकांचे नेतृत्व करणाऱ्या महिलांचे जग काय असते, त्यांच्यापुढची आव्हाने काय असतात, त्यावर त्या कशी मात करतात, त्यांचे अनुभव काय आहेत...याबाबतचा त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोच असे नाही. म्हणूनच, त्यांचे प्रतिनिधी म्हणून पुण्यातील अग्नि या ढोलताशा पथकाच्या मनिषा गोसावी आणि गायत्री शिरोडकर यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेला हा संवाद ढोलताशांमधील महिलांचा हा आवाज उलगडून दाखवतो.
हा एपिसोड यूट्यूबवर पाहायचा असेल तर पुढील लिंकवर क्लिक करा- https://youtu.be/TbvFdxPkYzw
भारतातील सर्वात प्राचीन भाषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संस्कृतची आधुनिक काळात पिछेहाट झाली. मात्र, अजूनही तिचे अस्तित्व टिकून आहे. किंबहुना, तिला आता उर्जितावस्था येते आहे. बदलत्या काळात संस्कृतचे महत्त्व आणखी वाढणार आहे. ते कसे, याच विषयी `संस्कृत भारती`चे अ.भा. प्रचार प्रमुख डॉ. सचिन कठाळे यांच्याशी संतोष देशपांडे यांनी संवाद साधला. या संवादातून संस्कृत का मागे पडली इथपासून ते संस्कृतमध्ये असे काय आहे, ज्यामुळे येत्या काळात तिचे महत्त्व वाढणार आहे इथपर्यंत अनेक गोष्टींची उलगड होते. संस्कृतकडे एक विषय म्हणून नव्हे तर एक भाषा म्हणून पाहिले गेले तर ज्ञान-रंजनाचे मोठे भांडार जगापुढे उलगडेल, याकडेही हा संवाद लक्ष वेधतो.
बदलत्या जगात तुम्हाला जितक्या भाषा अवगत असतील तितक्या पुढे येण्याच्या संधीही लाभतील. म्हणूनच, `स्टोरीटेल कट्ट्या`वर संतोष देशपांडे यांनी संस्कृतपासून मराठी-कन्नड-मल्यालम अशा कैक भाषांमध्ये पारंगत असणारे विद्वान अभ्यासक, अनुवादक वासुदेव डोंगरे यांना बोलतं केलंय. कर्नाटकातून महाराष्ट्रात येऊन मराठीवर प्रभुत्व मिळवून अन्य भारतीय भाषांवरही तितकेच प्रेम करणारे आणि त्यात आपले वेगळे करिअर घडवणारे भाषातज्ज्ञ वासुदेव डोंगरे यांचा आजवरचा प्रवास त्यांच्याकडून ऐकणे हा एक वेगळा अनुभव ठरतो. हा अनुभव केवळ भाषांवर प्रेम करण्याची प्रेरणाच देत नाही तर स्वतःला नव्याने शोधण्याची ऊर्मी जागवतो.
हा पॉडकास्ट युट्यूब वर पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/g9Gw1U_aMaI
गोंदियासारख्या दुर्गम भागातून आलेली मराठी मुलगी सृष्टी पाटील पर्यावरणशास्त्राचे धडे घेऊन आता थेट अंतराळ जीवसृष्टीवर संशोधन करते आहे. तिचा आजवरचा प्रवास अत्यंत वेगळा आणि प्रेरणादायी आहे. आपली आवड जोपासत, मनातील कुतुहलभाव कायम राखत करिअर कसे घडविता येऊ शकते, याचे दर्शन तिच्या या प्रवासातून घडते. स्टोरीटेल कट्ट्यावर सृष्टीने तिच्या या प्रवासाचीच नव्हे तर एकूणच या क्षेत्राची, त्यातील विविध संधींची केलेली उलगड वेगळी दिशा देऊन जाते. पर्यावरण अभ्यासाकडे पाहण्याची नवी दृष्टी देऊन जाते.
नव्या शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रात पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदीला प्राधान्य देण्याकडे सरकारचा कल असल्याचे दिसताच त्यावर मोठा वादंग सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर, सरकारच्या भूमिकेवर मराठीप्रेमी नागरिकांकडून आक्षेप घेतला जात आहे. अ.भा.वि.प.च्या विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेले आणि शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी याच वादंगावर आपली रोखठोक भूमिका मांडली. राज्यात मराठीला डावलून हिंदीचा पुरस्कार होत असल्याच्या टिकेवर त्यांनी मांडलेली दुसरी बाजू ऐकायला हवी.
पब्लिक रिलेशन्स (पीआर) किंवा जनसंपर्क क्षेत्रात मागील काही वर्षांत अनेक स्थित्यंतरे आली आहेत. मूळात हे `पीआर` क्षेत्र कसे विकसित झाले, सध्या ते कुठे आहे, भविष्यात त्यातील संधी काय असणार या विषयी अनेकांना कुतुहल आहे. अनेक नामवंत संस्था व वलयांकित व्यक्तींसाठी `पीआर`चा चेहरा म्हणून प्रसिद्ध असणारे या क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ तुषार जोशी यांच्याशी संतोष देशपांनी यांनी याच विषयावर संवाद साधला आणि त्यातून अनेक विषयांची सहज उलगड होत गेली. चाकोरीबाहेरील काही जाणू इच्छिणाऱ्या, करु इच्छिणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून ऐकावा असा हा वेगळा पॉडकास्ट.
निवृत्त सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी लोकसहभागातून सातारा जिल्ह्यातील आपल्या निढळ या गावाचा चेहरामोहरा बदलून टाकला. त्यांच्या या प्रेरणादायी कार्याची उलगड करणारे सुनील चव्हाण यांनी लिहिलेले पुस्तक निढळ – ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न नुकतेच प्रकाशित झाले. प्रसिद्ध अभिनेते व नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात नानांचे भाषण अत्यंत भावस्पर्शी, मनस्वी, दिशादर्शक होते आणि म्हणूनच ते संस्मरणीय देखील होते. कलाकार असलो तरी आपण समाजाकडे कसे पाहतो, लोकसहभागातून कार्य उभारले गेले तर त्याचे परिणाम काय होतात, अशा कामांमधून मिळणारे समाधान काय देऊन जाते यावर नाना पाटेकर दिलखुलास बोलले आहेत. म्हणूनच, प्रत्येकाने जरुर ऐकावे आणि मनात साठवावे असे हे नानाचे शब्द...श्रोतेहो खास तुमच्यासाठी.
अस्वस्थ जगात गुंतवणुकीच्या स्मार्ट संधी
अर्थात, श्रीमंत बनण्याचे रहस्य!
गुंतवणुकीच्या पारंपरिक मार्गाने न जाता असे कोणते मार्ग आहेत जे तुम्हाला खऱ्या अर्थाने श्रीमंत बनवतील, सध्या जगभरात अस्वस्थता असताना गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी काय करायला हवे, सोन्याचे भाव वाढतील की कमी होतील, गुंतवणुकीचे नेमके नियोजन का व कसे करायचे या व अशा प्रश्नांची उलगड गुंतवणूक सल्लागार संदीप भुशेट्टी यांनी केली आहे. त्यांचा स्वतःचा गुंतवणूकदार ते वेल्थ क्रिएटर हा प्रवास कसा झाला, याविषयी संतोष देशपांडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा अर्थपूर्ण संवाद प्रत्येकास नवी दिशा देऊन जातो.
`ऑपरेशन सिंदूर`च्या निमित्ताने अनेक गोष्टींवर चर्चा, विश्लेषण होते आहे. त्याचवेळी अशा लष्करी ऑपरेशनच्या वेळी सिक्रसी (गुप्तता), सरप्राइजेस का आणि किती महत्त्वाचे असते, सीमेवर लढणाऱ्या सैनिकाचे मनोधैर्य कसे असते, कसे टिकते याविषयी ब्रिगेडियर सुमंत दशरथ यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेला संवाद.
शरद पोंक्षे म्हणजे एक अवलिया कलाकार. आपल्या कट्टर सावरकरभक्तीमुळे अनेक वादळे ओढवून घेत विचारांशी असणारी बांधिलकी जोपासणारे व्यक्तिमत्व. कलाजीवनात आणि समाजजीवनात अशा आव्हानांना भिडताना, त्यांना नेमके काय जाणवते, याची उलगड संतोष देशपांडे यांसमवेतच्या त्यांच्या या संवादातून होते.आवर्जून ऐकावा असा हा हटके पॉडकास्ट.
इन्फर्मेशन वॉरफेअर म्हणजेच माहिती युद्धतंत्र हे माध्यमांच्या मदतीने केले जाणारे एक प्रकारचे युद्धच असते. त्यात शत्रू राष्ट्राकडून मीडिया युजर्स, चॅनल्स यांचा वापर केला जातो. कळत-नकळत अनेक जण त्यात ओढले जातात आणि त्याचा फायदा शत्रूला होतो. काश्मीरमध्ये पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर उद्भवलेल्या प्रसंगानंतर भारत सरकारने प्रसारमाध्यमे तसेच समाजमाध्यमकर्त्यांना मार्गदर्शक तत्वे आखून दिली आहेत. या पार्श्वभूमीवर, संरक्षण माध्यमांचे अभ्यासक प्रा. विनय चाटी यांनी संतोष देशपांडे यांसमवेतच्या संवादात या `इन्फर्मेशन वॉरफेअर`ची उलगड केली आहे. आजच्या घडीला प्रत्येकाने आवर्जून ऐकावा, समजून घ्यावा असा हा विषय.
सोन्याचा भाव लाखांवर पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर, असे नेमके कशामुळे घडले, भारतीयांना सोन्याचे इतके आकर्षण का आहे, सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर ठरते का, भविष्यात याकडे कसे पाहायला हवे अशा अनेक बाबींचा उहापोह ज्येष्ठ संपादक, अर्थक्रांती प्रतिष्ठानचे विश्वस्त यमाजी मालकर यांनी संतोष देशपांडे यांसोबतच्या या विशेष पॉडकास्टमध्ये केला आहे. सोन्याविषयी कुतूहल असणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून ऐकावा असा हा वेगळा संवाद.
चित्रपट असो वा साहित्यकृती त्याला इतिहासाची पार्श्वभूमी असेल तर त्यातून वाद निर्माण होतात. अलीकडच्या काळात रायगडावरील वाघ्यावरुन उफाळून आलेला वाद असो, छावा चित्रपटामुळे निर्माण झालेले वातावरण असो वा फुले चित्रपटाच्या ट्रेलवरवरुन सुरु झालेला वादंग असो....चित्रपट अथवा लेखनाकडे आपण इतिहास म्हणून खरंच पाहावा का, त्यातून समाजात जाणाऱ्या संदेशाकडे कसे पाहिले जातेय, त्यातून कलास्वातंत्र्याचा संकोच होतोय का, कलास्वातंत्र्य देखील सोयीचे असेल तरच त्याचा पुरस्कार होतो का या व अशा अनेक वादग्रस्त मुद्द्यांवर प्रसिद्ध साहित्यिक व संशोधक संजय सोनवणी यांच्याशी संतोष देशपांडे यांनी केलेली ही रोखठोक चर्चा.
प्रत्येक प्राण्याला मन असतं, ते व्यक्त करणारी त्यांची एक भाषाही असते. मात्र, मानवी जीवनात येणाऱ्या प्राण्यांच्या मनात काय चाललं आहे, ते काय बोलू पाहतात हे काही आपल्याला नेमकं लक्षात येत नाही. अशा वेळी टेलिपथिक अॅनिमल कम्युनिकेशन हे तंत्र उपयोगी येतं. त्यातील तज्ज्ञ असणाऱ्या प्राणीप्रेमी पत्रकार उमा कर्वे ही चक्क प्राण्यांशी संवाद साधते. हे नेमके कसे जमते, प्राणी तिच्याशी काय बोलतात, त्यांच्याशी बोलून तिला काय जाणवते या व अशा अनेक प्रश्नांची उलगड करणारा हा विशेष पॉडकास्ट. जागतिक पाळीव प्राणी दिनाच्या निमित्ताने, एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाणारा हा संवाद आपल्याला खूप काही शिकवून जातो.
मित्रा देसाई... जगापुढे भारतीयत्वाची खरी ओळख पुढे आणण्यासाठी संशोधन, लेखन आणि संवादातून तेजोमय भारत सारखी संकल्पना पुढे आणणारी, शीतळा, फ्लॅग ऑफ अनंता यांसारख्या जगाचे लक्ष वेधणाऱ्या पुस्तकांची लेखिका आणि तेजोमय भारत सारख्या संकल्पनेतून भारताचा खरा इतिहास जगापुढे उलगडू पाहणारी ऑस्ट्रेलियात राहणारी मराठमोळी लेखिका. अत्यंत अभ्यासपूर्वक, सप्रमाण आपले मुद्दे मांडून त्याची उलगडून स्टोरीटेलिंग म्हणजेच गोष्टीरुपांत जगापुढे आणू पाहणारी ही विदुषि संतोष देशपांडे यांच्याशी जेव्हा संवाद साधते त्यातून कित्येक गोष्टींची सहज उलगड होत जाते... आपण प्रत्येकाने आवर्जून ऐकावा, अनुभवावा आणि त्यातून बोध घ्यावा, असा हा स्पेशल पॉडकास्ट.